घाटनांदूर : एखादा बालक, व्यक्ती दिव्यांग असला तर आपण हिणवतो मात्र केवळ जनजागृती व समज नसल्यामुळे लसीकरण न केल्याने त्याल्या दिव्यांग आयुष्य जगावे लागत आहे. याला टाळण्यासाठी लसीकरण अतिशय आवश्यक असून, कोविडसारख्या महामारीच्या संकटात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अतिशय भरीव कार्य केल्याने आपण या गंभीर संकटातून बाहेर पडल्याचे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट यांनी केले.
घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१ जानेवारी रोजी सकाळी पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी जि. प. अध्यक्ष सिरसाट बोलत होत्या, तर प्रमुख अतिथी सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, पं. स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, ता.वै.अ.डॉ. बालासाहेब लोमटे, माजी उपसरपंच प्रा. सुरेश जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार, वै.अ.डॉ. माउली मुंडे, वै. अ. डॉ. विलास घोळवे आदी उपस्थित होते.
यावेळी सिरसाट म्हणल्या, भविष्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी गरोदर माता, बालक यांचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाप्रमाणेच नागरिक, माता पालकांनी यासाठी सचेत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड व्हॅक्सिनबाबतीत कुठलीही शंका न घेता, न घाबरता लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तालुका वै. अ. डॉ. बालासाहेब लोमटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी वै. अ. डॉ. माउली मुंडे, डॉ. विलास घोळवे, शेख,मस्के, गित्ते, वीर, प्रकाश जाधव, गणेश शिंदे, स्वामी, पाशाभाई पठाण, सर्व आशा स्वंयसेविका, गोरे, दिक्कत, बिक्कड आदींनी परिश्रम घेतले.