शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकरी हतबल असतानाच शेतातील विहिरीवरील विद्युत तसेच सौर इलेक्ट्रिक पंप चोरीच्या घटना देखील सातत्याने घडताना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अधिकच भर पडत आहे. अशाचप्रकारे गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील अमोल भाऊसाहेब बनसोडे यांच्या शेतातील विहिरीतील विद्युत पंप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
अमोल बनसोडे यांना कोळगाव शिवारात साडेतीन एकर जमीन असून त्यांची गट नं.४८२ मध्ये विहीर आहे. या विहिरीत ३ एचपीचा सौर ऊर्जा पंप बसविलेला आहे. दरम्यान शुक्रवारी या विहिरीतील जवळपास ४० हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. शनिवारी सकाळी अमोल बनसोडे हे शेतात गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. यानंतर अमोल बनसोडे यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास बीट अंमलदार प्रकाश खेडकर हे करत आहेत. दरम्यान परिसरात विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.