बीड : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. रखडलेले विविध अनुदान व विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
लॉकडाऊनमुळे स्थलांतर थांबले
बीड : तालुक्यातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे व विविध महानगरात रोजगारासाठी असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय बंद आहेत. गावातही हाताला काम नाही. सर्व बंद असल्याने महानगराकडेही जाता येईना. यामुळे अनेकांचे स्थलांतर थांबले आहे.
घंटागाडी येईना, नागरिकांची गैरसोय
अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहात आहे. गाडी नियमित व वेळेवर आल्यास योग्यरीत्या कचऱ्याची विल्हेवाट लागेल व स्वछता राहील. यासाठी घंटागाडी नियमित वेळेवर आली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांडे यांनी केली आहे.
‘ओव्हरलोड’ वाहतूक; लहान रस्त्यांची दैना
अंबेजोगाई : शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे, तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.