धानोरा : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोरा फाटा दरम्यान रस्त्याच्या वळणांवर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संरक्षक कठडे तातडीने बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या दोन्ही ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण
बीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारलेले हे निवारे शासकीय असताना अनेक ठिकाणी त्याचा खासगी वापर होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा
बीड : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. रखडलेले विविध अनुदान व विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
सात्रा, पोत्रा भागात वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा, पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिप्परने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
विनामास्क न फिरण्याचे आवाहन
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
माजलगावात गतिरोधकांची गरज
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे; परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.