...
रोहिणीच्या पावसाची हजेरी
आष्टी : तालुक्याच्या अनेक गावात तर शिरूर तालुक्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसात रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाला आहे. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त आहे. दरम्यान, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या आठ दिवसात मोठा पाऊस झाला तर शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागेल.
.....
सावरगाव-वृद्धेश्वर घाटाची दुरुस्ती करा
धानोरा : आष्टी तालुक्यातील सावरगाव घाट व पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थान दरम्यान असलेल्या घाटाची दुरवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षातही या घाटाच्या रुंदीकरणाची मागणी असतानाही याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. या घाटाचा बराचसा भाग नगर जिल्ह्यात येतो. तरी या घाटाची दुरुस्ती व रुंदीकरण करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
....
वृक्षारोपण मोहीम थंडावली
बीड : गेल्या दोन, तीन वर्षापूर्वी राज्य सरकारच्या वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला होता. यावेळी विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली आहेत. यातील अनेक झाडे जगली आहेत. परंतु कोरोनामुळे यंदा पावसाळा जवळ आला तरी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दिसत नाही. ग्रामीण भागातही ही मोहीम थंडावलेली दिसत आहे. तरी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवडीवर नागरिकांनी भर द्यावा, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
.....
बाजार समित्यांचे व्यवहार सुरू
बीड : जिल्ह्यात बाजार समित्या सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ७ ते २ या वेळेत परवानगी दिली आहे. यामुळे मंगळवारपासून बाजारात धान्य व शेतीमालाची आवक वाढली आहे. तरी शेतकऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन करुन आपला शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
....
लसीकरणासाठी घरोघरी जाऊन नोंदणी करणार
बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांची नोंदणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. यामुळे शिक्षक ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांची ॲपवरुन ऑनलाईन नोंदणी करणार आहेत. तसे आदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काढले आहेत.
....
पीकविम्यासाठी शेतकरी आक्रमक
बीड : गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर विमा कंपन्या अन्याय करीत आहेत. याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष आहे. या उलट सरकारच विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहेत. तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे तातडीने वाटप करावे. तसेच भरलेला विमा मंजूर करावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. १ जूनपासून शेतकरी संघटनांच्या माध्यमातून तालुका पातळीवर आंदोलनांनी जोर धरला आहे.
....
चारा, पाणी टंचाई वाढली
धानोरा : आष्टी तालुक्यातील शेडाळा, देवळगाव घाट, गंगादेवी परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. मका, घास पिकेही सुकून चालली आहेत. पाणी टंचाईचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर देखील होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.