सुरेश धस यांची मागणी
आष्टी : खताचा बफर स्टाॅक हा परळीतच ठेवल्याने आणि सर्व स्टाॅक एकदाच न काढता टप्प्याटप्प्याने बाहेर काढल्याने खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी सर्व खतांचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा घेतला; परंतु जिल्ह्यात खताचा बफर स्टाॅक करायचा असेल तर तो परळीतच केला जातो. परिणामी जसजसा स्टाॅक संपत येतो, त्यावेळी मात्र आष्टी, पाटोदा आणि शिरूर हे तालुके वंचित राहतात. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खताचा बफर स्टाॅक एकाच वेळी विक्रीसाठी काढावा, अशी मागणी आमदार धस यांनी केली.
काही कृृृृषी दुकानदार हे खताच्या एमआरपीपेक्षा जास्त भावाने खताची विक्री करीत असल्याच्या या अगोदर तक्रारी आल्या आहेत. यापुढे जर कोणताही दुकानदार जास्त दराने खत विक्री करीत असतील तर आमच्या हेल्पलाईनवर आपली तक्रार करावी. त्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही आमदार धस यांनी दिला.