लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : गेल्यावर्षी लाॅकडाऊनच्या तडाख्यात सापडून खर्चदेखील हाती लागला नसला तरी यावर्षी पुन्हा नव्या जोमाने तितकीच मेहनत करून झालेली तूट गोमळवाड्यातील शिक्षण क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भागवत गर्जे यांनी भरून काढली. शिकला सवरला शेतकरी शिक्षण क्षेत्रात काम तर करतोच परंतु इच्छुक शेतकऱ्यांनादेखील शेतात मार्गदर्शन करून आपल्या बरोबर इतरांनाही अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र सांगत आहे. सलग सहा वर्षांपासून खरबुज, टरबुज, काकडी, ढोबळी मिरची असे नवे-नवे सुधारित वाण निवडून वेळीच लागवड करून कमी मजुरी आणि अल्पावधीत लाखांवर उत्पादन गर्जे हे घेत आहेत. शेतकऱ्यांचा समूह करून सर्वांना लागवड, विक्रीपर्यंत भागवत गर्जे मार्गदर्शन करत असल्याने त्याचा फायदा विशेष तरूण उमदे शेतकरी घेत आहेत.
जानेवारीत खरबुजाची लागवड
भागवत गर्जे यांनी ज्ञानेश्वर बडे, अशोक जायभाये, प्रदीप जायभाये असा शेतकऱ्यांचा ग्रुप करून प्रत्येकाने एकर, सव्वा एकर क्षेत्रावर १५ जानेवारी रोजी खरबुज लागवड केली. मल्चिंग, सौरऊर्जा, ठिबक असे तंत्र वापरून खरबुज वेली जोमदार आणल्या, त्यांनी ६,५०० बियाण्यांची लागवड केली. आतापर्यंत एकरभर क्षेत्राला सर्व खर्च ५० ते ६० हजार रुपये झाला असला, तरी उत्पादन चांगले मिळणार असल्याचे सांगितले.
तूट भरून काढली, आता पुढचा नफा
लागवडीनंतर ७० दिवसांनी फळतोडीला सुरूवात झाली. आतापर्यंत जवळपास पाच टन मालाची नाशिक, बीडच्या बाजारात विक्री केली. आणखी किमान ७ ते ८ टन माल निघेल. प्रति किलोला साधारण १७ ते १८ रूपये ठोक भाव मिळाला असून खर्च व मागील वर्षीची तूट भरून निघाली. आता यापुढचा माल हा निव्वळ नफा राहील, असे गर्जे यांनी सांगितले.
प्रयोग फायदेशीर ठरला
सुधारित व सामूहिक शेती केल्यास नक्कीच फायदा होतो. हा अनुभव असल्याने इतरांनाही प्रवृत्त करतो व त्याचा फायदादेखील त्यांना मिळतो. शेती करताना नैराश्य भाव नसलाच पाहिजे. फक्त अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे असल्याचे भागवत गर्जे यांनी सांगितले.
भागवत गर्जे यांच्यामुळे आम्हीदेखील खरबुज शेतीचा प्रयोग केला आणि तो चांगलाच फायदेशीर ठरल्याचे ज्ञानेश्वर बडे, अशोक जायभाये व प्रदीप जायभाये यांनी सांगितले.
===Photopath===
110421\11bed_4_11042021_14.jpg~110421\11bed_3_11042021_14.jpg~110421\11bed_2_11042021_14.jpg