लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : ‘मानवलोक’च्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात कापूस पिकाचा समावेश आहे. यासाठी धारूर तालुक्यातील गावांना मुख्यत्वे यात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी सांगितले.
वाढता उत्पादन खर्च व असुरक्षित शेतमाल बाजार या प्रमुख शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष सेंद्रिय शेती कार्यक्रम मानवलोकमार्फत राबवण्यात येत आहे. यात विशेषत: कापूस पिकासाठी धारूर तालुक्यातील गावांना समाविष्ट करण्यात येणार आहे.
शेतीच्या वाटेला संकटे पूजलेली आहेतच. यातून मार्ग काढत पिकेल ते विकणार का, याची चिंता करण्यापेक्षा खात्रीची विक्री व्यवस्था, त्यात अधिकचे दोन पैसे सतत कसे मिळतील हे आपण शेतकऱ्यांनी पहायला हवे. वैयक्तिक एकटा शेतकरी हे करू शकणार नाही. मात्र एकत्र येत आपण नक्कीच हे साध्य करू शकतो. यासाठी मानवलोकने सेंद्रिय शेती कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आखला आहे. खरिपात आपण घेत असलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके तर रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी ही पिके यात घ्यायची आहेत. त्यामुळे दर, तंत्रज्ञान, मार्केट यासारखे सर्व प्रश्न सोडवण्याचा मानस या कार्यक्रमातून आहे, असे अनिकेत लोहिया यांनी सांगितले.