आष्टी तालुक्यात आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. महसूल, पोलिस प्रशासनाने साथ दिल्याने आकडा उतरणीला लागला होता. तुरळकच रुग्ण आढळून येत होते. पण नागरिकांचे दुर्लक्ष व प्रशासन निष्क्रिय होऊ लागल्याने आता हा दररोज वाढत चाललेला आकडा डोकेदुखी ठरत आहे. या महिन्यातील २६ दिवसात तालुक्यातील एक हजारवर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासन आता रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहे, निर्बंध कडक केले आहेत. पण तरीही नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ यांनी केली आहे.
याबाबत आष्टीच्या तहसीलदार शारदा दळवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, खासगी डाॅक्टर व औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनी रुग्णांना गोळ्या व उपचार देऊन नयेत अशा सूचना देऊन पॅथॉलॉजी लॅबवरदेखील नजर असल्याचे सांगितले. कोरोनाला अटकाव आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असून आता कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री शिंदे यांनी तालुक्यातील नागरिक नियमाचे उल्लंघन करत आहेत, मास्क वापरत नाही, गर्दी करतात सूचना करून देखील दुर्लक्ष करत असल्याचे त्याच्या या निष्काळजीपणामुळे आकडा वाढत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
१ ते २६ जुलै दरम्यानची आकडेवारी
एकूण कोरोना बाधित - १०२९
आरटीपीसीआर - १४४४
ॲंटिजन चाचणी- ११७७५
सीसीसी आष्टी उपचार- १८७
आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार- ११९
मृत्यू -६
---------------