खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी
अंबाजोगाई - राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. याचे पालन खाजगी प्रवासी वाहतूकदार करीत आहेत. खाजगी टॅक्सीमध्ये केवळ चार प्रवासी बसविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही सुरक्षिततेची हमी मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मंगल कार्यालये, लॉन बंदच
अंबाजोगाई : लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मंगल कार्यालये, लॉन व मंगल सेवावाल्यांना बसला आहे. तसेच या व्यवसायाशी संलग्न असणारे अनेक व्यावसायिक आहेत. ऐन लग्नसराईच्या वेळी व्यवसाय बंद झाल्याने हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळे परवानगी नसलेली मंगल कार्यालये, लॉन व मंगल सेवावाल्यांना त्यांचे व्यवसाय नियमांनुसार सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मंगलसेवा व्यावसायिक सुनील जाधव यांनी केली आहे.
वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात यावी. तरच शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होईल, अन्यथा पाण्याची उपलब्धता असूनही पिकांना पाणी मिळणार नाही. यासाठी क्षमता वाढवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.
कृषी माल वितरण व्यवस्था उभारावी
अंबाजोगाई - कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे एका बाजूला शेतमाल विक्रीचे आव्हान तर दुसऱ्या बाजूला कमी झालेले दर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून कृषी माल वितरण व्यवस्था उभारणीसाठी शासनस्तरावर योग्य विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ख्वाजामियाँ पठाण यांनी केली आहे.