--------------------------------
जलस्त्रोताची तपासणी करावी
अंबाजोगाई : पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने दूषित पाण्यामुळे विविध रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जलस्त्रोताची तपासणी करावी, अशी मागणी संजय देवळे यांनी केली आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरी, पोटदुखी असे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विहीर, बोरवेल, हातपंप, नळ आदी जलस्त्रोताची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
------------------------
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरातील काही नाल्याचा उपसा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आला. मात्र तेथील कचरा काढून नाल्याच्या शेजारीच टाकण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने तो कचरा पुन्हा नालीत जात आहे. त्यामुळे या कचऱ्यांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कुत्तर विहीर,भट्टगल्ली, जिरे गल्ली परिसरात नाल्याशेजारी कचरा दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
----------------------
पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे
अंबाजोगाई : नुकतीच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे युवकांमध्ये निर्माण झाला आहे. या भरतीसाठी युवकांना मार्गदर्शन मिळावे, या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबवण्याची मागणी आहे. पोलीस भरती प्रशिक्षणात परीक्षा व शारीरिक क्षमता चाचणीची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन मिळत असल्याने भरतीसाठी युवकांना मदत मिळते. त्यामुळे प्रशिक्षण राबवावे, अशी मागणी अक्षय जाधव यांनी केली आहे.
-------------------------
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
अंबाजोगाई : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते ; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेमध्ये चकरा माराव्या लागतात. तासनतास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी मानवलोक जनसहयोगच्या वतीने करण्यात येत आहे.