नृसिंह सूर्यवंशी/
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : पूस फिल्टर योजनेतूून घाटनांदूरसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीचे व्हाॅल्व अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. यामुळे या पाईपलाईनमधून सध्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
पूस पाणीपुरवठा योजनेवर पूर्वी २० खेडेगावांना पाणीपुरवठा केला जात होता. कालांतराने अनेक गावांनी स्वतःची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याने या योजनेवर फक्त अकरा गावे अवलंबून आहेत. त्यांना या प्रादेशिक पाणी योजनेतून नियमित पाणीपुरवठा होतो. त्यात घाटनांदूरसह पूस, वरवटी, अंबलवाडी, गिरवली आपेट, गिरवली बावणे, तळणी, हनुमंतवाडी, दत्तपूर, तेलघना, अंबलटेक या गावांचा समावेश आहे. पूर्वी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. नंतर ती जिल्हा परिषदेकडे वर्ग केली गेली. यानंतर या योजनेचे तीनतेरा वाजले. गत एक वर्षापासून पुन्हा देखभाल, दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे योजना दिली गेली. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित आहे. असे असतानाही अनेक वर्षांपासून एअर व्हाॅल्वची दुरुस्ती मात्र झालीच नाही. यामुळे सध्या या जलवाहिनीवर असलेल्या अनेक एअर व्हाॅल्वमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
घाटनांदूर येथे महादेव पट्टी मंदिरानजीक, अंबाजोगाई-अहमदपूर रोडवरील एअर व्हाॅल्ववरून सध्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जागोजागी पाईपलाईन फुटली आहे. त्यातूनही पाणी दररोज वाया जात आहे. अद्यापही अनेक भागात पुरेसा पाऊस नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे, तर एकीकडे फिल्टर झालेले लाखो, अब्जो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तरी ही पाणी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.
....
जर कोणी विनाकारण व्हाॅल्व, पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर करीत असेल किंवा पाण्याचा अपव्यय करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. सध्या जेथे पाण्याची गळती होत आहे. तेथे तातडीने कर्मचारी पाठवून त्याची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच पाणी गळती थांबविण्यात येईल.
-श्रीमंत लव्हारे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, पूस.
...