आष्टी : तालुक्यातील पांढरी येथील बीड - अहमदनगर महामार्गालगत गट क्र. ५९७ येथे सदाशिव पांडुरंग चौधरी यांची रहिवासी झोन असलेली २० गुंठे जमीन मालकीची आहे. या ठिकाणी ते १५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. २२ जून रोजी या जमिनीवर चौधरी यांनी अतिक्रमण केल्याची नोटीस पाटबंधारे विभागाने दिल्याने चौधरी यांना धक्का बसला आहे.
या नोटिसीवर आक्षेप घेत चौधरी यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. गावतलावाची परवानगी त्यांच्या गट नं ५९७ मधून आल्याचा कोणताही प्रस्ताव नसल्यामुळे हे काम चुकीच्या पध्दतीने चालल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर जमीन अकृषी आहे व त्याचा दरवर्षी आष्टी तहसील कार्यालयात महसूल भरणा करत असल्याच्या पावत्या आपल्याकडे आहेत. या जमिनीवर कसलेही अतिक्रमण नाही. हे काम कुठल्या योजनेंतर्गत सुरू आहे, यासंदर्भात आम्हाला कसलीही कल्पना नाही व आमचीही जमीन संपादित केलेली नाही. तसेच आम्हाला कसलाही मोबदला मिळालेला नाही. असे असताना आष्टी सिंचन विभागाने २२ रोजी दिलेली नोटीस चुकीची असल्याचे चौधरी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
स्थानिक राजकीय विरोधापोटी सिंचन विभागाला हाताशी धरून अशा प्रकारची गैरकारवाई असून कामाची योग्य ती पाहणी करून आपण हे चुकीच्या पध्दतीने चाललेले काम थांबविण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.