बीड : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी गेल्या दोन दिवसांत सात दुचाकी चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी रुग्णालय परिसरातील नातेवाइकांच्या दुचाकी लक्ष्य केल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील काही टोळ्या सक्रिय असल्याचे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांची गर्दी आहे. त्यांच्यासोबत नातेवाईकदेखील येतात. याचा फायदा हे चोरटे घेत असून, जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांसमोरून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मागील महिन्यापासून वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातून दोन दुचाकी लंपास झाल्याप्रकरणी शुक्रवारी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळू शंकर चव्हाण (रा. परभणी तांडा ता.वडवणी ) यांनी त्यांची दुचाकी जिल्हा रुग्णालयासमोर उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने लंपास केली. दुसऱ्या घटनेत प्रशांत रामभाऊ मिसाळ (रा. नवनाथनगर, बीड) यांची दुचाकी चोरट्यांनी याच परिसरातून चोरून नेली.
तिसरी घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील वायभटवाडी येथे घडली. येथील गोरख गाडे (रा. बकरवाडी ता. बीड) यांनी त्यांची दुचाकी शेताजवळ उभी करून ते कडबा काढण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. चौथ्या घटनेत भांटुंबा येथील माधव सखाराम धापाटे यांची दुचाकी (क्र. एमएच ४४ एच ८२५८) ज्ञानेश्वर चव्हाण याने दवाखान्यात जाण्याचे कारण सांगून लंपास केली. याप्रकरणी युसूफ वडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचवी घटना आष्टी शहरात घडली. येथील हॉटेल चालक सागर चंद्रकांत जाधव यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २३ एल १९५८) ही हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ती चोरट्यांने लंपास केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहावी घटना तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत घटली. मुनूबाई जवळा येथील रावसाहेब उन्हवणे (रा.गुंधा वडगाव, ता.बीड) यांची दुचाकी (क्र. एमएच २३ एल १९५८) ही २५ मे रोजी चोरट्याने चोरून नेली. सातवी घटना ही बीड तालुक्यातील आंबील वडगाव येथे घडली. येथील कपिल शाहूराव खिंडकर यांची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने टोळी ताब्यात घ्यावी
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या टोळीचा बंदोबस्त करावा व नागरिकांच्या चोरीच्या दुचाकी परत देण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.