गेवराई (जि.बीड) : सकाळी शेतामध्ये जात असताना एका शेतकऱ्याला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात हायवाने चिरडले. यामध्ये सदरील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू होऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ही घटना गेवराई तालुक्यातील गंगावाडी लगतच्या पुलावर ४ जानेवारी २१ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय ६०) हे सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षसभुवन येथून अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या अज्ञात हायवाने त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारा वाळू उपसा तत्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा, यासाठी गावकऱ्यांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.