बीड : देशात हुंडाबंदी कायदा अंमलात आला. त्याला १ जुलै २०२१ रोजी ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र, हुंड्याची कुप्रथा अद्यापदेखील सुरूच असून, बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप बदलत असल्याचे चित्र आहे. पूर्वी रोख रकमेत हुंडा घेतला जात होता. मात्र, आता त्याचे स्वरूप बदले असून, सोने, प्लॉट, गाडी, बंगला आणि फ्लॅटच्या स्वरूपात हुंडा घेतला जात आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी ‘आम्हाला हुंडा नको, तुमच्या मुलीला दागिने, प्लॉट, बंगला आणि गाडी द्या’ अशा स्वरूपाची मागणी केली जाते. ही परिस्थिती अनेक मध्यमवर्गीय व उच्चशिक्षितांमध्ये असल्याचे दिसून येत. तसेच मुलाचा व्यवसाय नोकरी यावरून त्याच्या हुंड्याची किंमत ठरत असून, वर्ग १ व वर्ग २ चे सरकारी अधिकारी असलेल्या मुलांसाठी हुंड्याची जणू बोली लागलेली असते, अशी परिस्थिती काही समाजात असल्याचे आढळून येते. विवाहानंतरदेखील अनेक विवाहितांचा पैशासाठी छळ होत असून, यामध्ये सर्व स्तरावरील कुटुंबांचा समावेश आहे. या जाचास कंटाळून अनेकवेळा विवाहित महिला आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे प्रकारदेखील घडले आहेत.
मात्र, सुशिक्षित पिढी काही प्रमाणत बदलत असून, हा बदल मुलींमध्ये मोठ्या प्रमाणत दिसून येत आहे. मुलींचा हुंडा देण्यासाठी नकार असून, हुंडा न घेता स्वीकार करणाऱ्या मुलांसोबतच संसार करण्याचा त्यांना मानस आहे.
हुंडा म्हणायला की पोराचा लिलाव ?
हुंड्याच्या नावाखाली पोराचा लिलावच केला जात असल्याचे समोर आले आहे.
हुंड्याच्या नावाखाली महागड्या वस्तूंची मागणी मुलीकडच्यांकडे केले जाते.
हुंड्याच्या नावाखाली मुलीच्यांकडून मोठा पैसे उकळण्याचा प्रकार काही घरांमध्ये केला जाते.
अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...
हुंडा मागणाऱ्यांमध्ये समाजातील अशिक्षित, उच्चशिक्षित कुटुंबांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले आहे.
बहुतांश मुलांच्या कुटुंबांना हुंडा हवा आहे. मात्र, त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. व्यवसाय नोकरीसाठी डोनेशन प्लॉट, फ्लॅट, सोने बंगला आणि गाडी भेट स्वरूपात घेतली जाते.
मुलींकडून विरोध केल्यानंतर विवाहानंतर या सर्व बाबींची मागणी केली जाते. तसेच यासाठी मुलीस त्रासदेखील दिला जाते.
मुलींचे माता-पिताही जबाबदारच...
सरकारी नोकरदार असल्याचा त्याच्यासोबत सोयरीक करण्यासाठी मुलीच्या घरच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांची असते त्यामुळे तेदेखील या परिस्थितीला जबाबदार आहेत. याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.
गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते
नवी पिढी बदलते...
उच्च शिक्षणात मुलींचा टक्का वाढला आहे. परिणामी जोडीदाराची निवड करताना त्याचे शिक्षण व स्वभाव या सर्व बाबी मुली पाहतात. त्यानंतर विवाहास पसंती देत आहेत. त्यामुळे मुलींचा हुंडा पद्धतिला कायम विरोध आहे.
भाग्यश्री वैष्णव, शिक्षक
जोडीदार शोधताना पालकांकडून उच्च शिक्षण व पॅकेजला महत्त्व दिले जात आहे. मात्र, आताच्या काळात मुलीदेखील कमवत्या असल्यामुळे त्यांना अनुरूप जोडीदार हवा असून, त्यांना समजून घेणारा पती त्यांना हवा आहे.
सचिन कोटुळे, पालक