लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : गेल्या वीस वर्षांपूर्वी माजलगाव शहरात घाण्याच्या तेलाला मागणी होती. कालांतराने फिल्टरच्या नावावर पॅकबंद बॉटलमधील तेलाला मागणी वाढत गेली. यामुळे शहरातील शेकडो बैलघाणे बंद झाले. आता केवळ एकच घाणा सुरू असून तोही बैलांऐवजी विजेवर चालणारा आहे. आरोग्यासाठी घाण्याचे तेल चांगले असल्याने या तेलास गेल्या दोन वर्षांत मागणी वाढली आहे. सध्या नागरिकांना या तेलासाठी दोन-दोन दिवस वेटिंग करावी लागत आहे.
वीस वर्षांपूर्वी नागरिकांना केवळ घाण्यातून तयार झालेले करडईचे तेल मिळत असे. हे तेल धान्याच्या माध्यमातून तयार करण्याचे काम तेली समाजाकडून केले जात होते. त्याकाळी करडईचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे
त्या काळात मोठ्या प्रमाणावर तेल काढणारे घाणे मोठ्या प्रमाणावर दिसत असत. या घाण्याला एक बैल जुंपून तो दिवसभर घाण्याला फिरत असे.
त्यात करडी बारीक होऊन तेल निघत असे. करडई दर्जेदार असल्या कारणामुळे एका दिवसाला केवळ १ क्विंटल तेल निघत असे. फिल्टर नसतानाही दर्जेदार तेलाचे उत्पन्न होत असे. माजलगाव शहरात असे १५० करडई तेलाचे घाणे चालत. अख्ख्या तालुक्याला हे घाणे चालक तेल पुरवत असत. या घाण्यावर अनेकांना रोजगार मिळत असे.
...
आरोग्यासाठी घाण्याचेच तेल चांगले
पाम, सोयाबीन तेलापुढे करडई महाग असल्याने घाण्याचे तेल घेणाऱ्यांची संख्या रोडावली. मागील दहा वर्षांत घाण्याच्या तेलाला ग्राहक राहिले नसल्याने कालांतराने माजलगाव शहरात चालणारे १५० तेलाचे घाणे बंद पडले. केवळ सुभाष सुखदेव गायगवे यांनी आपला घाणा अद्याप बंदच केला नाही. त्यांनी बैल विकत घ्यायला जास्त पैसे लागत असल्याने मोटार बसवून घाणा चालू ठेवला.
सध्या बाजारातील अनेक प्रकारच्या तेलामुळे विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने डॉक्टरांकडून चांगले तेल खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे नागरिक सेंद्रिय पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या घाण्याच्या तेलाकडे वळले आहेत.
...
...असे तयार होते करडईचे तेल
प्रथम एका मशीनद्वारे करडईच्या बियांवरील टरफल बाजूला काढून टाकले जाते. त्यातील गराला मशीनच्या घाण्यात टाकून त्याद्वारे तेल काढण्यात येते. सुरुवातीस हे तेल काळे व गाळयुक्त दिसते. त्याला गरम केल्याने गाळ खाली राहून चांगले तेल काढून घेण्यात येते. सध्याच्या करडईद्वारे जास्त तेल मिळत नसल्याने दररोज मशीनद्वारे एकच क्विंटल तेल निघते.
यामुळे हे तेल घेण्यासाठी २-३ दिवस वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. तेल निघाल्यानंतर जो चोथा राहतो, त्याची पेंड तयार करण्यात येते. त्या पेंडीला ढपली पेंड म्हणत असत. ही पेंड बाजारातून गायब झाली असून सध्या या पेंडीलाही मागणी वाढली आहे.
------
माजलगाव शहरात यापूर्वी १५० तेलाचे घाणे चालत असत. दहा वर्षांत पॅकिंगच्या तेलाची मागणी वाढली. यामुळे शहरातील सर्व घाणे बंद झाले. यामुळे अनेक घाणे चालक वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळले. फक्त मीच कायमस्वरूपी घाणा चालू ठेवला. मागील एक वर्षापासून घाण्याच्या तेलाला मागणी वाढली आहे. यामुळे आम्हाला रात्रंदिवस घाणा चालवूनही तेल पुरेनासे झाले आहे. या कामात पत्नी लक्ष्मी हिचा मोलाचा वाटा आहे.
-सुभाष गायगवे, तेल घाणाचालक.
--------
सध्या बाजारातील तेलामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या तेलामुळे चरबी वाढणे, चरबीच्या गाठी तयार होणे, मेंदुविकार, हृदयविकार व आजार उद्भवू लागले आहेत. यामुळे नागरिकांनी ट्रिपल फिल्टर केलेले तेल खाणे आवश्यक आहे. नागरिकांनी करडई, त्यानंतर सूर्यफूल तेलाचा खाण्यात वापर करावा.
-डॉ. यशवंत राजेभोसले, हृदयविकार तज्ज्ञ.
310721\img_20210731_120259_14.jpg~310721\img_20210731_120226_14.jpg
तेलाचा घाणा हाकताना सुभाष गायगवे.~