लोकमत न्यूज नेटवर्कपरळी (जि. बीड) : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ९ जणांवर लातुरात तर दोघांवर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत.
परळी-बीड राज्य रस्त्यावर पांगरी शिवारात अठरा वर्षांपूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या साखर कारखान्याची उभारणी केली. सध्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा गेल्या हंगामात हा कारखाना उसाअभावी बंद होता. यंदा काही दिवसांपूर्वीच ऊस गाळपास प्रारंभ झाला होता. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास कारखान्यातील उसाच्या रसाने भरलेल्या टाकीचे कॅप गळून पडले. साखर प्रक्रियेसाठी हा रस दुसºया टाकीत नेण्यापूर्वीच गरम रसाची ही टाकी फुटल्याने कर्मचाºयांच्या अंगावर उकळलेला रस पडला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. तेथील प्रत्येकजण मदतीसाठी धावून जात होते.
यात कारखान्याचे काही कर्मचारी व खाजगी कंत्राटदाराचे काही कामगार जखमी झाले. हा रस ४०० डिग्री सेल्सिअस इतका उष्ण होता, अशी माहिती आहे. मधुकर पंढरीनाथ आदनाक (५०) यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गौतम तुकाराम घुमरे (५०), सुभाष गोपीनाथ कराड (४५), सुमित अनंतराव भंडारे (१८) हे १०० टक्के भाजले असून सुनील भागवत भंडारे (२४) ९५ टक्के, रामभाऊ माणिक नागरगोजे (४२) ९० टक्के, लहुदास अभिमान डाके (२५) ६३ टक्के व धनाजी राजेश्वर देशमुख (४५) हे ६० टक्के भाजले आहेत. याशिवाय आणखी दोघांवर लातुरात उपचार सुरू असल्याचे डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले.
उर्वरित दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत. वृत्त लिहीस्तोवर या चौघांमधील चंद्रकांत मिसाळ आणि अदिनाथ भंडारी या दोघांचीच नावे समजू शकली. या घटनेनंतर कारखान्यातील सर्व प्रक्रि या बंद ठेवण्यात आली.जखमींना वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक व्ही.जी.दगडे, येवले, पानढवळे, सुरक्षा अधिकारी डी.एल.जायभाये यांच्यासह इतर कर्मचाºयांनी तातडीने परळीच्या खाजगी रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रुग्णालयात दाखल केले. तेथून लातूर येथील डॉ. विठ्ठल लहाने यांच्या दवाखान्यात आधी आठ जणांना व नंतर रात्री आणखी दोघांंना हलविण्यात आले. या घटनेबद्दल राज्याच्या ग्रामविकास मंत्री व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले असून शनिवारी जखमींची त्या भेट घेणार आहेत.
घटनास्थळास अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी विशाल आनंद, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनुराधा गुरव, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के.जे.सपकाळ, जमादार नवनाथ ढाकणे, विष्णू घुले यांनी भेट देऊन पाहणी केली.