लोकमत न्यूज नेटवर्क
अंबेजोगाई : बीड जिल्ह्यातील दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या कर्जदारांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नाही. त्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सलग काही वर्षे असणारा दुष्काळ, शेतीमालाला हमी भाव नसणे, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात येत होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शेतकरी कर्जमाफी मुख्य मुद्दा होता. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर, २०१९ मध्ये शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. ही कर्जमाफी सरसकट असून, त्यासाठी कोणत्याही अटी, शर्थी नसल्याचेही सांगण्यात आले होते. नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याबाबतही शासनाकडून घोषणा करण्यात आली होती. मात्र, दीड वर्ष उलटले, तरी अद्याप या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, दुष्काळ, सततचे कोरोना लॉकडाऊन, यामुळे खचलेला शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करावी, अशी मागणी मुंदडा यांनी केली आहे.