लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यातील खळवट लिमगाव येथील शेतकरी धनंजय माने यांच्या शेतातील पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवार रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे.ग्रामीण भागात महावितरणाच्या विद्युत वाहिन्या जुन्या व अक्षम बनल्या आहेत. लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक ठिकाणी पिके जळून खाक होत आहेत. महावितरणाच्या दुर्लक्षामुळे एकाच गावातील ही दुसरी घटना घडल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.लिमगाव शिवारातून वीजतारांचे खांब काही शेतकºयांच्या जमिनीतून गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही ना काही घटना घडतच असते. आठ दिवसांपूर्वीच येथील तीन शेतकºयांचा तब्बल वीस एकर ऊस जाळून खाक झाला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी १२ वाजता धनंजय माने यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारेमध्ये घर्षण होऊन झालेल्या शार्टसर्कीटमुळे जाळ झाला आणि त्यांच्या उसाला आग लागली. या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाला असून, तब्बल चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकºयांना मदत करावी अशी मागणी होत आहे.
पाच एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:49 IST