माजलगाव : शहरात नगरपालिकेद्वारे मान्सूनपूर्व कामे होणे अपेक्षित असताना नगरपालिकेने त्यास बगल दिली. यामुळे सोमवारी संध्याकाळच्या दरम्यान अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने अनेक भागांत अनेकांच्या घरात व दुकानांत पाणीच पाणी झाले होते.
माजलगाव नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर देऊनही शहरातील अनेक भागातील नाल्या अद्याप काढलेल्याच नाहीत. असे असताना संबंधित ठेकेदाराला नगरपालिकेचे पदाधिकारी ना मुख्याधिकारी त्यास काही बोलतात. त्याचाच गैरफायदा संबंधित ठेकेदार घेत असताना दिसत आहे. यामुळे शहरातील नाल्या जागोजागी तुंबल्याने भर उन्हाळ्यामध्ये नाल्यांचे पाणी रस्त्यावरून जाताना दिसत होते.
पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेकडून एप्रिल-मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे होणे आवश्यक होते. पावसाळा सुरू व्हायला केवळ आठ दिवस बाकी आहेत.
सोमवारी माजलगाव शहरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. नाल्या तुंबलेल्या असल्याने व पहिलाच पाऊस जोरदार झाले हे सर्व पाणी नाली वाटेन जाता रस्त्यावरून वाहत होते. शहरातील मठगल्ली, मशीद चौक, गोंदणी चौक, झेंडा चौक भागातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी वाहत होते. त्यामुळे या भागातील अनेक घरांत घाण पाणी गेल्याने घरात घाण साचून दुर्गंधी पसरली होती.
आंबेडकर चौकातून मोंढयात जाणाऱ्या रस्त्यांवरदेखील अनेक महिन्यांपासून पाणी साचत असताना नगरपालिकेने याकडे साधे लक्षदेखील दिले नाही. दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी पाण्यात बसून आंदोलन केली असतानादेखील नगरपालिकेला जाग आली नाही. नगरपालिकेच्या चुकीमुळे सोमवारी पडलेल्या पावसात या भागातील आणि दुकानात पाणी गेल्याने अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरू केलेली नाहीत. येत्या दोन दिवसांत मान्सून पूर्व कामाला सुरुवात करण्यात येईल.
--विशाल भोसले , मुख्याधिकारी न. प. माजलगाव
===Photopath===
010621\camscanner 06-01-2021 155412_1_14.jpg~010621\purusttam karva_img-20210531-wa0026_14.jpg