आष्टी : खरीप २०२१चे पीककर्ज दलालाविना तत्काळ वाटप करावे व कर्ज वाटपात हस्तक्षेप करणाऱ्या दलालांचा समूळ नायनाट करावा, तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखा दलालमुक्त कराव्यात, असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख यांनी सोमवारी तहसीलदारांना दिले.
खरीप हंगाम २०२१साठी १ जूनपासून पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे. महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत कर्जमुक्ती मिळालेले बरेच शेतकरी अद्याप नवीन पीककर्जापासून वंचित आहेत, तसेच नवीन खातेदार पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
पीककर्ज वाटप करताना बहुतेक बँक शाखेत दलाल आहेत, तशी तक्रार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे याआधीदेखील केली होती. मागील वर्षी तलाठी, ग्रामसेवकांच्या मार्फत कर्ज प्रकरणे दिली गेली. त्यातही भ्रष्टाचार झाला. कारण त्या फाईल ग्रामसेवक, तलाठ्यांच्या सहाय्यकाने जमा केल्या. त्यातील ठराविक फाईल दाखल झाल्या व बाकीच्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर तक्रारीही आल्या होत्या. त्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख यांनी सोमवारी येथील तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर बलभीमराव सुंबरे, रहेमान सय्यद व सरपंच प्रा. राम बोडखे यांच्या सह्या आहेत.
ठराविकांचा असतो हस्तक्षेप
बहुतेक बँक शाखेत स्थानिक कर्मचारी हस्तक्षेप करत दहा टक्के रक्कम घेतात तसेच ठराविक स्थानिक नागरिकही यात सामील असतात. स्थानिक कर्मचारी फाईल मंजूर करतो, खालची फाईल वर घेतो, असे सांगून पैशांची मागणी करतात तसेच मंजूर फाईलच्या सह्या घेताना स्टेशनरीच्या नावाखाली पैशांची मागणी करतात, असा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आलेला आहे.