लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन करून शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना खासदार प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी भेट दिली. गेल्या आठवड्यात देऊळगाव, शेडाळा, सावरगाव, गंगादेवी या परिसरात ढगफुटी झाली होती. या पावसाने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी यावेळी त्यांनी केली. यावेळी त्यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच कोरोनात आलेल्या आर्थिक संकटाने बेजार आहोत. त्यात अतिवृष्टी यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आठ दिवस झाले तरी नुकसानभरपाई मिळेना, अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांंनी मांडल्या.
यावेळी मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आपणही पीकविमा, मदतीसाठी प्रयत्न करू, असे सांगतिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.