अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी खरीप हंगाम चांगला झाला. समाधानकारक झालेल्या पावसामुळे सगळीकडचे जलस्राेत तुडुंब भरले आहेत. सोयाबीन, उडीद, मूग, मका व ऊस लागवडीसोबतच भाजीपाला लागवडीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. कांदा, बटाटे यासोबतच फळभाज्या व पालेभाज्या लागवडीवर शेतकऱ्यांचा मोठा भर आहे.
----------
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील शेपवाडी परिसर ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. एका बाजूने रस्ता खोदल्याने दुस-या बाजूने वाहने जातात. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीचालक व चारचाकीचालक त्रस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी केली आहे.
-------
पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव
अंबाजोगाई : गेल्या दोन दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन या पिकाला मोठा धोका उद्भवू शकतो. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता वाढते. परिणामी, महागडी कीटकनाशके फवारण्याची वेळ शेतक-यांवर येते.
---------
परराज्यांतील कामगारांची भटकंती
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून परराज्यांतील कामगार अंबाजोगाई शहर व परिसरात रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. यातील काही मंडळी लोखंडी खाटा, टेबल, खुर्च्या, चटया, विविध प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचे काम करीत आहेत. आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी अंबाजोगाई परिसरात पाल ठोकून हे परप्रांतीय राहू लागले आहेत.
-----------
बँकेत ग्राहकांची गर्दी कायम
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात बँकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्था, मल्टिस्टेट, या सर्वच ठिकाणी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशी स्थिती असतानाही मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न पाळणे, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. ग्राहकांकडून होणाऱ्या या दुर्लक्षाकडे बँक प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन करावे.
------------
आर्थिक मदतीची मागणी
अंबाजोगाई : कोरोनाच्या कालावधीत अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सहा महिने प्रत्येकाचे व्यवसाय बंद राहिले. या व्यवसायांसाठी काम करणारे कामगार या कालावधीत बेरोजगार राहिले. सलून व्यावसायिक, भाजी विक्रेते, हातगाडेवाले यांच्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अद्यापही भेडसावणारा आहे. अशा स्थितीत या छोट्या व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नगरसेवक संतोष शिनगारे यांनी केली आहे.
-------------
नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांत वैताग
अंबाजोगाई -: प्रवाशांच्या सेवेत हे ब्रिदाचे ओझे घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या थकलेल्या बसेस आजही प्रवास करीत आहेत. भंगार, खिळखिळ्या व नादुरुस्त बसमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक बसमधून सीटांची मोठी दुरवस्था झालेली आहे. अनेक खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. खिडक्यांचे गज निघाल्यामुळे प्रवाशांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे अशा नादुरुस्त बस बंद ठेवाव्यात व नवीन गाड्या वाहुतकीसाठी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
--------------