धारूर : शहरातील मैंदवाडी रस्त्यावर शेतीसाठी वीजपुरवठा होत असलेले दोन विजेचे खांब काही दिवसांपूर्वी पडले होते. यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचा-यांनी काही वीजखांब उभे केले आहेत. परंतु, अजूनही काम अपुरे आहे. तरी, हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
मैंदवाडी रस्त्यावरील विजेचे खांब पडल्यानंतर नागरिकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. दोन विजेचे खांब कर्मचा-यांनी उभे केले. मात्र, इतर कामे अर्धवट ठेवली. एका शेतक-याच्या शेतात तर वीजखांब वाकल्याने तारा लोंबकळत आहेत. यामुळे येथे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी, हे काम तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील शेतकरी विनायक शिनगारे, ओमप्रकाश थोरात, अशोक शिनगारे व ग्रामस्थांनी केली आहे.