मोजून घेतलेल्या शेत जमिनीत लाकडे का टाकतात व जनावरे का बांधतात ती जमीन नांगरायची आहे,अशी विनंती करणाऱ्या वयोवृध्द शेतकऱ्यास बेदम मारहाण झाल्याची घटना २१ मे रोजी तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथे घडली. सुभाष शंकराव गौरकर (६६) असे त्या पीडीत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शेतकरी सुभाष गौरकर यांची शेती श्रीपतरायवाडी येथे असून त्यांनी नुकतीच आपली शेती भूसंपादन कार्यालयामार्फत मोजून घेतली होती. मोजून घेतलेल्या जमिनीवर आरोपींनी लाकडे टाकून जनावरे बांधली होती. जमीन नांगरण्यासाठी ती मोकळी करा अशी विनंती त्यांनी आरोपींना केली असता संतापलेल्या आरोपींनी शेतकऱ्यास बेदम मारहाण केली. या प्रकरणी शेतकरी सुभाष गौरकर यांच्या फिर्यादीवरुन महादेव धोंडीबा तारळकर, बाळासाहेब महादेव तारळकर, आकाश महादेव तारळकर, रमेश महादेव तारळकर (सर्व राहणार श्रीपतरायवाडी) या चार आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस नाईक खेडकर करीत आहेत.