लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केला. याचा राग मनात धरून काही वीजबिल न भरणाऱ्या उत्साही ग्रामस्थांनी पुन्हा पोलवरून वीज कनेक्शन जोडून वीज पुरवठा सुरू केला; तर चोरीची वीज वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मीटरधारक ग्रामस्थांनी केली आहे.
रामेवाडीच्या ग्रामस्थांना वीजबिल भरण्याची विनंती वीज वितरण कंपनीच्या जोशी मॅडम यांनी वारंवार केली होती. तरी अनेकांनी वीज बिले भरली नाहीत. याबाबत स्थानिक पत्रकारांना चुकीची माहिती देत काही वृत्तपत्रात वृत्त प्रसिध्द केले. यानंतर उलट चोरून वीज पुरवठा सुरू केला. याबाबत मीटरधारक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून, वीजबिल वसुलीबाबत माहिती घेऊन चोरून वीज वापरणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.