अंबाजोगाई : नोटबंदीनंतर अस्तित्वात आलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या फाटक्या, तुटक्या, चिटकवलेल्या जीर्ण नोटांचे प्रमाण सध्या वाढले आहे. या नोटा व्यवहारात आल्यानंतर काही दिवसांतच वापरायोग्य राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या १० व ५० रुपयांच्या नोटा अल्पावधीतच जीर्ण होत असल्याने ग्राहक व व्यावसायिकांना त्या सांभाळणे कठीण झाले आहे.
कोणतीही नोट फाटल्यावर तिला चिटकवून व्यवहारात आणताना ग्राहक व व्यापारी या दोन्ही वर्गांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बऱ्याच वेळा फाटक्या, जीर्ण नोटांवरून बाजारपेठेत ग्राहक व व्यापारी यांच्यात हमरीतुमरीच्या घटना घडताना दिसतात. त्यातच बँकेमध्येही फाटक्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. फाटक्या नोटांमुळे कमी उत्पन्न गटातील अनेकांचे आर्थिक व्यवहार रखडतात. जीर्ण नोटा चलनात न आल्याने काहींना नुकसानही सोसावे लागते.
स्टेट बँकेत जीर्ण नोटा बदलण्याची व्यवस्था असली तरी सतत असलेली मोठी गर्दी लक्षात घेता सामान्य नागरिक त्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे प्रशासनाने या जुन्या व फाटक्या नोटा बदलून देण्याची व्यवस्था प्रत्येक बँकेत करावी, तरच या समस्येवर तोडगा निघू शकतो.
चिल्लर भरपूर झाली
जुन्या, फाटक्या व चिटकवलेल्या जीर्ण नोटांना पर्याय म्हणून १,२,५,१० रुपयांची चिल्लर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वापरात असल्याचा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आहे ती चिल्लर ग्राहकांना बळजबरीने दिली जाते. त्यामुळे चिल्लर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
१० रुपयांचा रोकडा डोकेदुखी
१० रुपयांचा रोकडा चलनात असतानाही बाजारपेठेत तो रोकडा स्वीकारला जात नाही. तो चलनातून बाद झाला असल्याचे अनेक व्यापारी सांगतात. मात्र, आजही हा रोकडा कुणाला दिला तर तो कोणीही स्वीकारत नाही. त्यामुळे ज्याच्याकडे हे रोकडे उपलब्ध आहेत, ते कोणी घेतच नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.