कोरोना गेल्याच्या अविर्भावात गेवराई तालुक्यातील नागरिकांकडून बेफिकिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तालुका प्रशासनच्या वतीने दिलेल्या सूचनांची आणि नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, त्याला नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना महामारीने उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाचा कहर वाढत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना संसर्ग तीन महिन्यांपूर्वी कमी झाला होता. परिणामी हळूहळू बाजारपेठ, शाळा कॉलेज सुरू करण्यात आल्या.
आठवङी बाजार, विवाह समारंभ, एस. टी. स्थानक आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, नियमात शिथिलता येताच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर बंद झाला. तसेच सॅनिटायझरही अनेकांनी हद्दपार केले. त्यामुळे परिस्थिती बदलली आणि पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कोरोनाचा कहर वाढतच आहे. कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर नागरिकांनी स्वतःला काही नियम लावून घेणे गरजेचे बनले आहे.
गेवराई तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाने डोके वर काढले आहे. त्याला थोपविण्यासाठी आमची सर्व टीम काम करीत आहे. यात नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. कोविड लस तालुक्यातील सर्वांनी वेळेत घेतली पाहिजे, तरच त्याविरूद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढणार आहे.
डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी, गेवराई