गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा एम.आय.एम तसेच वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
येथील नगर परिषदेच्यावतीने शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वंचित बहुजन आघाडी व एम. आय. एमचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपरिषदेत गेले असता तेथे मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते कार्यालयीन अधीक्षकांना भेटले. त्यांना मीटरने पाणी तपासून दाखवले असता टिडीएस ६०० च्यावर असल्याचे निदर्शनास आले. किमान ४०० पर्यंत टिडीएस आवश्यक असून यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शुद्ध पाणीपुरवठा करून गेवराईकरांचे आरोग्य अबाधित राखावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व एम.आय.एमच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी एम.आय.एमचे मोमीन एजाज,शेख ईनुस, वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड, सतीश प्रधान, किशोर भोले, शेख रिजवान आदी उपस्थित होते.