-------------------
बियाणे मोफत पुरविण्याची मागणी
अंबाजोगाई : यावर्षी कोरोना संकटामुळे प्रत्येकाचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातून शेतकरीही सुटला नाही. सध्या पावसाळा आला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीसोबतच शेतकरी बियाणांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र आर्थिक कोंडीमुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बघता, बियाणे यावर्षी मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपाचे ॲड. संतोष लोमटे यांनी केली आहे.
--------------------
वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी
अंबाजोगाई : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू केला. त्याची थकबाकी अद्याप मिळाली नाही. ती थकबाकी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
--------------------
‘धोकादायक पुलाला कठडे लावा’
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून काही चोरीलाही गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आदनाक यांनी केली आहे.
-----------------
कोरोनामुळे कर्ज माफ करण्याची मागणी
अंबाजोगाई : दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि विविध योजनांतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज भरणे आता कठीण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी आता केली जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक नागरिकांनी व्यवसाय थाटण्याकरिता शहरी व ग्रामीण सुवर्ण जयंती रोजगार योजनेसह इतर योजनेतून राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेतले. मात्र लॉकडाऊनमुळे कर्जाची परतफेड करणे सद्यस्थितीत कठीण जात आहे. यासाठी अशा नागरिकांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाणे यांनी केली आहे.