पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील उपविभागीय कार्यालय, आरोग्य, शिक्षण, मुद्रांक सहनिबंधक व इतर अनेक कार्यालये प्रभारींवर सुरू आहेत, तर येथील तहसीलदार, डीवायएसपी, बीडीओंकडे इतर ठिकाणचा पदभार असल्याने कार्यालयात अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत.
येथील उपविभागीय अधिकारी हे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे. सहा महिन्यांपूर्वी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांना या पदावरून बडतर्फ केल्यानंतर हे पद रिक्त असून, परळी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचा पदभार देण्यात आला आहे. येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद मागील ४-५ वर्षांपासून रिक्त आहे. येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार हा चार-सहा महिने वेगवेगळ्या विस्तार अधिकाऱ्यांकडे दिल्याने अनेक कामांत अडचण येत असून, शिक्षकांवर त्यांचा वचक राहिलेला दिसून येत नाही.
येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बदली झाल्याने वडवणी येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे येथील पदभार देण्यात आला आहे, तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचा पदभार दिल्याने हे पद रिक्त आहे. येथील सहायक निबंधक मुद्रांक कार्यालयातील निबंधकाचे पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहे. याचा प्रभारी पदभार इतरांकडे दिल्याने या ठिकाणी अनेक वेळा आर्थिक कारणांमुळे वारंवार भांडण होत असल्याच्या घटना होत असतात.
येथील तहसीलदारांकडे वडवणी तहसील कार्यालयाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे धारूर पंचायत समितीचा पदभार देण्यात आला आहे. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केज येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा पदभार देण्यात आला आहे.
माजलगाव येथील अनेक कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. येथील अनेक अधिकाऱ्यांकडे इतर ठिकाणचा पदभार दिला आहे. यामुळे हे अधिकारी कधी इकडे तर कधी तिकडे जात-येत असल्याने तर कधी बैठक तर कधी दौऱ्यावर जावे लागत असल्याने कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर खेटे मारण्याची वेळ येत आहे.
------
राजकारण्यांचा स्वार्थ
येथील अनेक कार्यालयांत महत्त्वाच्या पदांवर इतर ठिकाणचे अधिकारी किंवा त्याच कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे पदभार दिला जात आहे, तर येथील अधिकारी इतर ठिकाणचा पदभार देण्यामागे राजकारणाचा एक भाग समजला जातो. नेत्यांची ॲडजेस्टमेंट व राजकारणामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.