बीड : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले, कामाला आणखी गती येणार, असे पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
बीडकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकारदेखील निधीची पूर्तता करत आहे. केंद्र सरकारने केलेल्या शंभर कोटींच्या तरतुदीमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला, असे पंकजा मुंडे आणि खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे.
या रेल्वेमार्गाच्या कामामध्ये जातीने लक्ष देत आहे. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेणे असो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे असो, प्रयत्न चालू आहेत; परंतु हा रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मुंडे भगिनींनी केली आहे.