अंबाजोगाई : येथील जय जवान आजी माजी सैनिक संस्थेतर्फे सोमवारी २२ वा कारगिल विजय दिवस शहिदांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप व संपूर्ण संचालक मंडळ आणि संस्थेतील अंदाजे दोनशेहून अधिक सभासद,महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रारंभी कॅ.पांडुरंग शेप व कॅ.सय्यद खाजा नजिमोद्दीन यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन केले. संस्था परिसरात अभिवादन सभा झाली. सूत्रसंचालन महादेव कांदे यांनी केले. प्रारंभी संस्थेचे सचिव कॅ. अभिमन्यू शिंदे यांनी कारगिल युद्धाचा इतिहास कथन केला.
---------
या कार्यक्रमात कारगिल युद्धात सक्रिय सहभाग राहिलेले संस्थेचे ज्येष्ठ संचालक कॅ. शेख उस्मान यांनी युद्धातील स्वतःच्या अनेक आठवणी व अनुभव सांगितले. प्रत्यक्ष डोळ्यांसमोर युद्धामध्ये झालेल्या शहिदांच्या शौर्याचे वर्णन करताना कॅ.उस्मान भावुक झाले तर ऐकताना श्रोत्यांना शहारून आले. शहीद जवानांच्या कुटुंबावर जे दुःख व संकट आले. त्या संकटांवर मात करण्याची ताकद जगाच्या निर्मात्याने त्यांना द्यावी असे भावनिक विचार त्यांनी व्यक्त केले.
---------
कॅ. पांडुरंग शेप म्हणाले, जे शहीद झाले त्या जवानांच्या अंत्यविधीपर्यंतच शासकीय अधिकारी दुःख व्यक्त करतात. पण,नंतर मात्र त्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनस्तरावर कोणीही विचारत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत,सहकार्य केले जात नाही. त्यामुळे यापुढे सर्व सैनिक परिवारांनी एकत्र येऊन,याप्रश्नी लक्ष देऊन जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रश्नांची सोडवणूक करून सैनिक कुटुंबाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन कॅ. शेप यांनी केले.
-------
260721\img-20210726-wa0078.jpg
अंबाजोगाईत शहीद दिन साजरा