लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा जोर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कमी झाला आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यात तालुक्यातील सहा हजार ५४३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यात कोरोनाची बाधा झालेल्या १४३ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सहा हजार पाचशे रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा तडाखा सहन करीत, रुग्ण आणि नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. मे महिन्यात नागरिकांना प्रचंड त्रास झाला. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती. रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडाली. उपजिल्हा रुग्णालयातच कोविड रुग्णांसाठी दोन विभाग चोवीस तास कार्यरत आहेत. याशिवाय शहरात भगवती चित्र मंदिर, र.भ.अट्टल महाविद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, धोंडराई, गढी येथील शारदा कोविड सेंटर विभाग आहेत. या सेंटरवर सद्य:स्थितीत सव्वाचारशे रुग्ण उपचार घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयाच्या आणि सामाजिक संस्थेच्या मिळून येथील उपजिल्हा रुग्णालयात जवळपास १३ रुग्णवाहिका कार्यरत असल्याने रुग्णांना अत्यावश्यक सेवा देता आली. त्यामुळे रुग्णाला गेवराई रुग्णालयातून पुढील उपचारासाठी बीड, औरंगाबाद येथे नेण्यासाठी सोपे गेले, असेही कदम यांंनी सांगितले.
....
रुग्ण कल्याण समिती स्वयंसेवकांची मदत
गेवराई
शहरातील कोरोना रुग्ण कल्याण समितीच्या स्वयंसेवकांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापासून ते ऑक्सिजन, इंजेक्शन, आर्थिक मदत, जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी चांगले काम केले असल्याचे समितीचे ॲड. सुभाष निकम, महेश दाभाडे यांनी सांगितले.