अमरावती : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे. त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळला जाऊन झेडपीचे गट व पंचायत समितीच्या गणांचीही फेररचना केली जाणार आहे. शहराचा दर्जा मिळालेली गावे वाढल्याने एकूण ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन गट व गणांची संख्याही कमी होऊ शकते. जिल्ह्याच्या राजकारणावरही याचा परिणाम जाणवणार आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांचा समावेश आहे. यांची आर्थिक, राजकीय आदी सर्वच रचना बदलून जाणार आहे. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या साधारणपणे २० लाखांवर आहे. शहरी लोकसंख्या ८ लाखांवर आहे. चार नगरपंचायती नव्याने अस्तित्वात येणार असल्याने या लोकसंख्येच्या प्रमाणातही फरक पडणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे निकष नव्याने ठरविण्यात येऊन गट व गणांची फेररचना होणे क्रमप्राप्त आहे. या रचनेत अनेक दिग्गजांचे गट रद्द होऊ शकतील. या गावातील मतांवर अवलंबून असणाऱ्यांना आता जिल्हा परिषदेच्या राजकारणातून काढतापाय घ्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० व जिल्हा परिषदेचे ५९ गट आहेत. यातील काही ठिकाणच्या रचनेत बदल होणार असून नगरपंचायतीचे क्षेत्र वगळता उर्वरित भागांची फेररचना होऊन गट व गण कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना प्रामुख्याने विविध करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी निधीही मिळत असतो. नव्याने पालिका व पंचायती होणाऱ्या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेचे नियंत्रण संपुष्टात येणार असल्याने उत्पन्न व निधीत घट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सध्याच्या एकूण महसूल कोट्यवधी रुपयांचा असून नगरपंचायतींमुळे या ठिकाणच्या महसुली उत्पन्नास मुकावे लागणार आहे. याचा जिल्हा परिषदेच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.
जिल्हा परिषद गटांची होणार फेररचना
By admin | Updated: May 13, 2015 00:34 IST