शुद्ध पाण्यावर राहणार महिलांचा वॉच
मिशन जलजीवन : प्रत्येक गावातील पाच महिलांना प्रशिक्षण
अमरावती: गावातील शुद्ध पाण्यावर आता गावातील महिलांचा वॉच राहणार आहे. मिशन जलजीवन अंतर्गत फिल्ड टेस्ट किटव्दारे पाण्याची गुणवत्ता तपासणी बाबत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील पाच महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षद्वारे हे प्रशिक्षण घेण्यात आले होते.
जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबरोबरच गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे . शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता कक्ष मार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाच महिलांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ८४० ग्रामपंचायतीमधील प्रत्येक पाच महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक-खासगी स्त्रोत याची माहिती देण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची निगा राखणे , स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम पाणी गुणवत्ता विशेष तपासणी फील्ड टेस्ट किटचा वापर करणे तसेच किट हाताळण्याची माहिती देण्यात आली. पाण्याची गुणवत्ता ढासळली तर आरोग्यावर होणारे परिणाम पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे याबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. पाणी व स्वच्छता विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांच्यासह जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार नीलिमा इंगळे, प्रशिक्षण समन्वयक सचिन बानसकर आदींनी ऑनलाईन प्रशिक्षण दिले.
कोट
ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे आहे यासाठी ग्रामस्तरावर पाण्याची ज्यांचा अधिक संबंध येतो त्या महिलाच यावर आता लक्ष ठेवणार आहेत त्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.
श्रीराम कुलकर्णी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग