हजारो लिटर पाण्याचा अपव्यय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत विशेष
अमरावती : पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्याच नसल्यामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातील हे पाणी ५५ ते ६० किलोमीटरच्या प्रवास करून अमरावतीपर्यंत पोहोचविले जाते. दरम्यान पाण्याची ३५ टक्के गळती होत आहे. दर दिवसाला साधारणात शहरवासियांना ११५ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तोसुध्दा मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रत्येक व्यक्तीला दरदिवसाला १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये जीवन प्राधिकरणाकडून प्रती व्यक्ती ११० लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. जीवन प्राधीकरणाचे शहरात ८५ हजार नळजोडणी आहेत. त्यापैकी आतापर्यंत १२०० सार्वजनिक नळ सुरु होते. मात्र, मध्यंतरी काही नळजोडणी पाण्याच्या अपव्ययामुळे बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ९५० सार्वजनिक नळ सुरु आहेत. या नळांपैकी बहुतांश नळांना तोट्याच नाहीत. त्यामुळे हजारो लिटर पाणी नालीत वाहून जात आहे. हे नळ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या सोयीचे आहेत. मात्र, नळांना तोट्याच नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या सार्वजनिक नळांच्या बिलांचा भरणा महापालिकेकडून केला जातो. मात्र, महापालिकेकडे तब्बल ८४ कोटींचे पाणी बिल थकीत आहे. एकीकडे पाण्याचा अपव्यय तर दुसरीकडे बिलाची थकबाकी. असा सावळा गोंधळ महापालिकेकडून सुरु आहे. नळांना तोट्या बसविण्यात याव्यात किंवा सार्वजनिक नळ बंद करावे, याबाबत जीवन प्राधिकरणने कळवून देखील पाण्याच्या अपव्ययाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. लोकमतने जलमित्र अभियानाला सुरूवात केली असून यातून अनेकांना पाणी वाचविण्याबाबत प्रेरणासुध्दा मिळाली आहे. आता अमरावतीकरांनीसुध्दा पाणी बचतीचा ध्यास धरणे काळाची गरज बनली आहे.