बबलू देशमुख : संप मागे घेण्याचे आवाहन अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांचा संप विशिष्ट हेतुने प्रेरित असून कर्मचारी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बँकेसह शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. वास्तविक कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर असून आठ ते दहा दिवसांत कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा बँके चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला. बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, बँकेच्या काही कर्मचारी नेते असंतुष्ट असून त्यांनी इतर कर्मचाऱ्यांची ढाल पुढे करून हे संपाचे हत्यार उपसले आहे. गत चार वर्षांच्या कार्यकाळात बँकेची स्थिती पाहून विद्यमान बँकेच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना ५० ते ७० टक्के वेतनवाढ दिली आहे. विदर्भातील इतर सहकारी बँकांच्या तुलनेत निश्चितच ही वाढ भरीव स्वरूपाची आहे. कर्मचारी नेत्यांकडून बँकेला नफा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी हा नफा शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाचा आहे. त्यामुळे केंद्रशासनाप्रमाणे डीए लागू करणे सध्या तरी शक्य नाही. वास्तव ओळखून कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रूज होण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पत्रपरिषदेला बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक प्रकाश काळबांडे, बंडू देशमुख, रवींद्र गायगोले, संजय मार्डीकर, एस.बी. साबळे, एस.जे. पावडे, पी.आर. काशिकर, पी.बी. अलोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी राठोड, व्ही. डी. धोबे उपस्थित होते. कामावर रुजू न झाल्यास कारवाईचा इशाराही दिला. बँकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरीव वाढ केली आहे. त्यांच्या बऱ्याच मागण्यादेखील निकाली काढण्यात आल्या आहेत. परंतु विशिष्ट हेतुने प्रेरित कर्मचाऱ्यांच्या हा संप पूर्णत: बेकायदेशीर आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. - बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा बँक.
-तर कठोर कारवाई
By admin | Updated: May 14, 2015 00:14 IST