अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील मालुर या गावातील गत ७० वर्षात एकदाही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. आजपर्यंत गावात एसटी पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही. आजूबाजूला घनटाट जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा हैदोस ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे काहीही करा, मालुर गावांचे पुनर्वसन रोखू नका, अशी हाक ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
मालुर ग्रामस्थांनी गावातील दुरावस्थेची कैफियत निवेदनातून मांङली आहे. गावात चौथीपर्यत शाळा असून, तीन घरांनाच वीज मिटर आहे. एकदा वीज गुल झाली की, आठ ते दहा दिवसांपर्यंत वीज येत नाही. गावची शेती ही मुरूमाची आहे. गावात आजपर्यंत मोबाईलची रेंज नाही. गावात साधा दवाखाना सुद्धा नाही. कुणी आजारी पडले की, ४० किमी. अंतरावरील धारणी येथे उपचारासाठी जावे लागते.गत वर्षी मांगीया गावचे शिरजगाव कसबा येथे पुनर्वसन झाले. मांगीया ग्रामस्थांना पुनर्वसनानंतर मिळालेल्या सोईसुविधा नजरेसमोर आहेत. परिणामी मालुरचे पुनर्वसन करावे, यासाठी एकमताने ठराव झाला आणि ठरावाची प्रत
प्रशासनाला सुपूर्द केली. दिवाळीनंतर मालुर येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन होत असून, काहींनी वाघोली तर, काहींनी बहिरम
येथे पुनर्वसनाला पसंती दर्शविली. मात्र, मालुर येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन अचानकपणे रोखण्यात आले आहे.एनजीओंनी
कोऱ्या कागदावर घेतलेल्या स्वाक्षरीमुळे मालुरचे पुनर्वसन थांबल्याची माहिती आहे. आता मालुरचे पुनर्वसन करा, ते रोखू नका, आम्ही स्वेच्छेने पुनर्वसीत होत आहे, अशी मागणी किसन चिमोटे, चंदुलाल जामुनकर, सुगंधी जामुनकर, मानकु कास्देकर, भुरा कास्देकर, ब्रिजलाल मावस्कर, जानकुलाल चिमोटे, सुशिल चिमोटे, सुनील चिमोटे, साबुलाल चिमोटे आदींनी केले आहे.