नातेवाईकांच्या वेदना : दमदाटी करेपर्यंत गेली मजल, पोलिसांची चुप्पी का ? अमरावती : नरबळीच्या हल्ल्यातून बचावलेल्या प्रथमेशवर उपचार सुरू असलेल्या इस्पितळात ट्रस्टींची जत्थ्याने ये-जा कशासाठी, हा गंभीर प्रश्न तपास करणाऱ्या पोलिसांना विचारमग्न का करीत नाही, हा मुद्दा समाजमन अस्वस्थ करीत आहे. प्रथमेशसोबत त्याच्या आई-बाबांव्यतिरिक्त आत्या, मामा, बहिणी इस्पितळात असतात. त्यांनी इस्पितळात राहू नये, यासाठी आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी त्यांच्यावर दबाव आणतात. प्रथमेशच्या आप्तेष्टांचे इस्पितळात असणे, हे समर्थनीयच आहे. ते प्रथमेशचे रक्ताचे नातेवाईक आहेत. पण, आश्रमातील ट्रस्टींचा काय संबंध?, वारंवार ते येतात तरी कशासाठी, या प्रश्नांचे गूढ कायम आहे. प्रथमेश उपचार घेत असलेल्या इस्पितळात शंकर महाराज यांच्या आश्रमाचे पदाधिकारी सातत्याने ये-जा करीत असतात. ते थेट प्रथमेश दाखल असलेल्या आयसीयू कक्षात पोहोचतात. त्यांची भाषा आणि देहबोली उपकार केल्यागत आणि अधिकार गाजविणारी असते. प्रथमेशच्या नातेवाईकांची अनुमती न घेता, त्यांना विश्वासात न घेता, जणू प्रथमेशवर आमचीच हुकूमत आहे, अशा आविर्भावात ते धाडधाड प्रथमेशजवळ पोहोचतात. कधीकधी त्यांची अख्खी टीमच येते. येणाऱ्यांची ओळख विचारली तर नीटपणे ओळख दिली जात नाही. दिशाभूल करणारी आणि संशय निर्माण करणारी उत्तरे दिली जातात. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला झुगारले जाते. देशात कायदा आहे की नाही? राज्यात पोलीस आहेत की नाही? गरिबांना कुणी वाली नाही काय? आमची मुले केवळ मारण्यासाठीच आहेत काय ? आमच्या मुलांना धोका असला तरी त्याची दखल घ्यायचीच नाही, असा सरकारचा निर्णय झाला आहे काय? पोलिसांना केवळ श्रीमंतांच्याच पाठीशी बळ उभे करण्याचे आदेश आहेत काय, असे नाना प्रश्न प्रथमेशचे रक्ताचे नातेवाईक बेंबीच्या देठापासून रोज विचारताहेत.प्रथमेशला सुरक्षा असल्याचे, दोन पोलीस खासकरून नेमल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांनी घोषित केले होते. प्रथमेशचे नातेवाईक कळवळीने सांगतात, पोलीसही आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभावात आहेत. प्रथमेशच्या कक्षाच्या द्वाराजवळ ते कधी नसतातच. ते आयसीयूच्या मागे गप्पा करीत बसलेले असतात, अथवा नागपूरच्या गल्ल्या फिरत असतात. ज्या आश्रमात त्याचा गळा चिरला गेला, जेथे त्याच्या हत्येचा-नरबळीचा प्रयत्न झाला, त्या आश्रमातील पदाधिकाऱ्यांना प्रथमेशच्या कक्षात जाण्यासाठी पोलीस कधीच मज्जाव करीत नाहीत. माणूस धर्मापेक्षा पैसा मोठा, अशी वृत्ती आश्रमातून येथे येणाऱ्या लोकांची झाली आहे. आमच्याशी बोलताना ते आमच्या जातीवर, योग्यतेवर बोलतात. डिवचतात. तुम्ही करूच काय शकता? तुम्ही जिंकून तर दाखवा, अशी अपमानाची अन् खिजविण्याची भाषा वापरतात. प्रथमेशच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करून जाते. आमचा मुलगा यांच्याच आश्रमात कापला, त्याचे यांना दु:ख नाही, त्याचा यांना क्लेश नाही. त्याबाबत अपराधीपणाची भावना नाही. नम्रता, सुसंस्कृतपणाशी संबंधच नाही. उलटपक्षी आम्ही इतके लाख लावले, तितके लाख लावले. आहे का तुमची कुवत ? दुसऱ्या संस्थेने लावले असते काय पैसे, दाखवा कोणती संस्था पैसे लावते ते, असे उर्मट प्रश्नदेखील ही मंडळी वारंवार विचारतात. जगाला ओरडून ओरडून सांगतात. आमचे जेवण ते काढतात. इतक्या लोकांना खाऊ घातले, अशी उद्धट भाषा ते वापरतात, आमचा सवाल असा आहे की, आम्ही तुमच्या घरी याचना करायला आलो नाही. तुम्ही आमच्या घरून मुलगा नेला. तो तुमच्याच आश्रमात कापला गेला. काय करीत होते तुम्ही? पैसे लावले तर काय उपकार झाले? आम्ही काही जेवण मागायला तुमच्या घरी आलो नाही. जीव घेण्याचा प्रयत्न तुमच्या अधिपत्त्याखाली कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. दोष तुमचा आहे, म्हणून केला तुम्ही खर्च. आणून देणार का आमचा प्रथमेश परत पूर्वीसारखाच? देता का आणून त्याचे भडाभडा वाहवलेले रक्त? आणता का त्याचा गोड कंठ परत? मूल कापले त्याची वेदना होण्याऐवजी पैसा लावला याचा अहंकार बाळगता, हीच का तुमची संस्कृती, असे अनंत सवाल नातेवाईकांचे आहेत. मुद्दा इतका ताणला जाईपर्यंत आश्रमातील लोकांना इस्पितळात प्रवेश दिलाच जातो कसा? कार्याध्यक्ष शिरीष चौधरी हे कायद्याला आव्हान देण्याची भूमिका इस्पितळात वठवितात. तरीही पोलीस त्यांच्यावर गुन्हे का नोंदवीत नाहीत?
‘ते’ रक्ताचे नातेवाईक ट्रस्टींचा अधिकार काय?
By admin | Updated: September 14, 2016 00:07 IST