संजय खासबागे - वरुडतालुक्यात अज्ञात तापाने पाय रोवले असून डेंग्यूसदृश आजार, मलेरिया, टायफाईडने बाधित अनेक रूग्ण नागपूर, अमरावतीसह स्थानिक खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अज्ञात तापाचा सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये जाणवत आहे. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या आजारांच्या उपचारासाठी मोठा खर्च येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील राजुराबाजार, वाडेगाव शेंदूरजनाघाट, लोणी परिसरातील अनेक रूग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. खासगी रूग्णालयांमध्ये डेंग्यूूचा रूग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे गरजेचे असूनही खासगी रूग्णालयांमधून ही माहिती दिली जात नसल्याने आरोग्य विभागाजवळ डेंग्यूच्या रूग्णांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील अस्वच्छतेमुळे साथरोग पसरत आहेत. राजुराबाजार, वाठोडा, शेंदूरजनाघाट, बेनोडा, आमनेर, लोणी आदी गावांमध्ये वेगाने अज्ञात आजार पसरत आहेत. खासगी दवाखान्यातून थेट नागपूर किंवा अमरावती येथे रुग्णांना उपचारार्थ पाठविण्यात येत आहे. परंतु हजारो रूपयांचा खर्च झेपत नसल्याने आर्थिक समस्येमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. स्थानिक पालिका प्रशासनाने स्वच्छतेची दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे.
वरूड फणफणतेय निदान होईना!
By admin | Updated: October 29, 2014 22:42 IST