अमरावती : मार्चपासून सुरू झालेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नवीन वर्षात कमी होईल, असे संकेत मानले जात होते. मात्र, नव्या वर्षातही जानेवारीपासून दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी तब्बल १७९ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बाब जिल्हा प्रशासनाची चिंतनीय मानली जात आहे.
शासनाने कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे गृहीत धरून व्यापारी संकुल, मॉल, बाजारपेठा, मंगल कार्यालये, आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना नियमावलींचे पालन करावे, अशी बंधने लादण्यात आली आहेत. तथापि, ८० टक्के नागरीक मास्कचा वापर करीत नाही, हे वास्तव आहे. काही प्रमाणात शाळा सुरू झाल्यात. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढत असल्याचे आढळून येत असलेल्या संक्रमितांच्या रुग्णसंख्येवरुन स्पष्ट होत आहे.
आरोग्य प्रशासनाच्या माहितीनुसार, बुधवारी एकूण १७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, गत २४ तासात दोन रुग्ण दगावले आहेत. यात छत्रसालनगरातील ६७ वर्षीय पुरूष तर, अंबिकानगरातील ६४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४२२ रुग्ण दगावले. तसेच मार्च २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान २२ हजार २७६ संक्रमित आढळून आले आहेत. नव्या वर्षात प्रथमच सर्वाधिक १७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद बुधवारी झाली आहे. त्यामुळे कोरोना अद्यापही गेला नाही, हे त्याचे जिवंत उदाहरण ठरणारे आहे.
----------
असे वाढले कोरोना संक्रमित रुग्ण
२५ जानेवारी- ८७
२६ जानेवारी- १११
२७ जानेवारी- ३८
२८ जानेवारी- ७८
२९ जोनवारी- ७८
३० जानेवारी- १४९
३१ जानेवारी- १२८
१ फेब्रुवारी- ९२
२ फेब्रुवारी- ११८
३ फेब्रुवारी- १७९
-------------------
जनतेला त्रिसूत्रीचा विसर
कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जनेतला मात्र त्रिसूत्रीचा विसर पडल्याचे वास्तव आहे. आजही नागरीक बिनधास्तपणे वावरत असून, मास्कचा वापर करीत नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय कोरोना रोखता येणार नाही, असे जिल्हाप्रशासनाने म्हटले आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र, नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
-----
बाधितांची वाढती संख्या ही बाब प्रशासनासाठी चिंतनीय आहे. नागरीकांनी कोरोना नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने नियमावलींचे पालन करण्यासाठी कठोर उपाययाेजना केल्या जातील.
-प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका.