प्रशासनाचे दुर्लक्ष, मेळघाटात पाणी पेटू लागले, एकझिरा, कोयलारी, पाचडोंगरीत टँकरची मागणी
नरेंद्र जावरे
चिखलदरा : उन्हाळ्याची चाहूल लागताच मेळघाटातील आदिवासी पाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासणार असल्याचे दृश्ये दिसू लागली आहेत. अतिदुर्गम हतरु येथील सरपंच ढाण्यात कृत्रिम पाणीटंचाई असून, एकझिरा, कोयलारी व पाचडोंगरी या तीन गावांत टँकरची आवश्यकता भासू लागली आहे.
चिखलदरा तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि विविध उपक्रम राबविते. पाणीटंचाईचा आराखडा दरवर्षी जिल्हास्तरावर राबविला जात असताना, सदर गावे टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही. पाणीपुरवठ्याच्या त्याच त्या योजनांवर दुरुस्तीपोटी होणारा लाखो रुपयांचा खर्च योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारा आहे. पाण्याची पातळी खोलवर जात असताना हातपंपाची पातळी कायम राहावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन पूर्णत: ढेपाळले आहे.
शाश्वत योजना हव्यात
मेळघाटातील अतिदुर्गम भाग म्हणून हतरूची ओळख आहे. तेथील सरपंच ढाण्यात गतवर्षी विहिरीचे खोदकाम करण्यात आले. त्या विहिरीतून सरपंच ढाण्यातील आदिवासींना पाणी काढण्यासाठी रांग लावावी लागत असल्याचे चित्र आहे. नळ योजनचा प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून दाखल करण्यात आला असला तरी प्रशासकीय पातळीवर तो गुंडाळून ठेवल्याची माहिती पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी दिली. एकझिरा, पाचडोंगरी व कोयलारी या तीन गावांत दोन आठवड्यांपासून पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने तेथील सरपंचांनी चिखलदरा पंचायत समितीला टँकरची आवश्यकता असल्याचे सुचविले आहे.
कोट
हतरू येथील सरपंच ढाण्यात पाणीटंचाईसंदर्भात ग्रामसेवकांना माहिती मागितली आहे. तीन गावांत टँकरचा प्रस्ताव येताच पाहणी केली जाईल. वरिष्ठांनी मंजूर करताच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
- नरेंद्र ठाकरे, पाणीटंचाई निवारण कक्ष, पंचायत समिती, चिखलदरा