गणेश देशमुख - अमरावतीअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दमदार उमेदवारांची मारामार आहे. नवेच्छुकांना त्यामुळे या मतदारसंघात मोठी संधी उपलब्ध आहे. नवागतांमध्ये दावेदारीसाठी सुरू झालेली पराकोटीची चढाओढ नागरिकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरला आहे. दर्यापूरचे आमदार अभिजित अडसूळ यांचा निवडणुकीपूर्वी त्या मातीशी दुरान्वये संबंध नव्हता. वडिलांच्या खासदारकीमुळे अमरावती जिल्ह्याशी संपर्क आलेल्या अभिजित यांचे वास्तव्य मुंबईत. जसे ते निवडणुकीपूर्वी, तसेच ते निवडणुकीनंतरही! मोदींच्या लाटेचा लाभ त्यांचे पिताश्री आनंदराव अडसूळ यांना झाला; तथापि अभिजित यांना तो कितपत होणार याबाबत काळच काय ते सांगेल. सन २००९ पासून अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात १९९० ते २००९ पर्यंत प्रकाश पाटील भारसाकळे यांनी राज्य केले. ते सतत चार वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. डिसेंबर २००६ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राणे यांनी फोडलेल्या आमदारांमध्ये भारसाकळे यांचाही समावेश होता. शेवटच्या अडीच वर्षांचा आमदारकीचा त्यांचा कार्यकाळ काँग्रेसच्या तिकिटावरील होता. निसटता विजय त्यांना मिळाला होता. त्यानंतर राखीव मतदारसंघाचे पहिले आमदार अभिजित हे ठरले. दावेदारांच्या चढाओढीचा लाभ आमदार अभिजित अडसूळ यांच्यासाठी जसा मागच्यावेळी लाभाचा मुद्दा होता तसाच तो यावेळीही लाभाचा मुद्दा ठरू शकतो. शिवसेनेच्या या गडात काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची यादी मोठी आहे. श्रीराम नेहर, अमरावतीचे किशोर बोरकर, पक्षाच्या डॉक्टर सेलचे पदाधिकारी असलेले आकोटचे हृदयरोेगतज्ज्ञ कैलास जपसरे, युवक काँग्रेसचे भूषण खंडारे, अचलपूरचे नगराध्यक्ष अरुण वानखडे या सर्वांना संधीची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा स्थानिक चेहरा या मतदारसंघात नाही. लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांच्या नाकात दम आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांची दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. नवनीत दर्यापुरातून लढल्यास जिल्हाभरात दर्यापूर मतदारसंघ आकर्षणाचा विषय ठरेल. भाजपक्षाकडे या मतदारसंघात चेहरा नाही. सातत्याने मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपक्षाने तसा प्रयत्नच केला नाही. आज वेगळे लढण्याची वेळ आल्यास भाजपसमोर पेचप्रसंग उभा ठाकेल. भारिप-बहुजन महासंघ या जागेची मागणी करीत आहे. विष्णू कुऱ्हाडे यांची दावेदारी आहे. आरपीआयकडून रामेश्वर अभ्यंकर आणि बळवंत वानखडे ही दोन नावे चर्चेत आहेत. आरपीआयची भूमिका अद्याप निश्चित नाही. मनसेसाठी गोपाल चंदन आणि अविनाश गायगोले हे प्रबळ दावेदार आहेत. लोकसभा निवडणूक लढविणारे गुणवंत देवपारे यांच्या नावाची बसपाकडून अधूनमधून चर्चा होते; तथापि त्यांचा मतदारसंघात संपर्क सुरू झालेला नसल्यामुळे बसपातर्फे दुसरे नाव येण्याची शक्यता अधिक आहे.
दर्यापुरात उमेदवारांची मारामार
By admin | Updated: June 12, 2014 23:38 IST