दर्यापूर : मुलाने एक वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर वैफल्यग्रस्त पित्यानेही सोमवारच्या रात्री दर्यापुरच्या आठवडी बाजारात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पनोरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.दर्यापूर तालुक्यातील पनोरा येथील बाबुराव नागोजी वानखडे (७५) यांना तेजराव नावाचा मुलगा होता. तो आॅटो चालक होता. परंतु गतवर्षी तेजरावने परिस्थितीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर परिवाराचा चरितार्थ चालविण्याची जबाबदारी वडिल बाबुराव नागोजी वानखडे यांच्यावर आली. त्यांनी तेजरावच्या मुलांचा सांभाळ केला. वानखडे यांच्याकडे सात एकर शेती आहे. परंतु सततची नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. सेवा सहकारी सोसायटीचे देखिल त्यांच्यावर कर्ज होते. यंदाही पाऊस लांबणीवर पडल्याने याहीवर्षी हीच स्थिती राहील असे त्यांना वाटत होते.कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने त्यांनी सोमवारी रात्री दर्यापुरातील बैलबाजारात अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी नागरिकांच्या लक्षात आला. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना त्यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात माझ्यावर बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. मागील वर्षी त्यांचा मुलगा तेजराव यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूरावजी वानखडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती तालुक्यातील पनोरा येथे कळताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
आर्थिक परिस्थितीने घेतला एकाच कुटुंबात दोघांचा बळी
By admin | Updated: June 25, 2014 00:08 IST