अमरावती : तालुक्यातील ४६पैकी ४४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. दोन ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत. १८ जानेवारीला विलासनगर येथील शासकीय गोदामात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीत ९३ हजार ५७७ मतदारांपैकी ६८ हजार ६४८ मतदारांनी मतदान केले होते. तालुक्यात अंजनगाव बारी, पुसदा, शिराळा, माहुली जहांगीर, नांदगाव पेठ या मोठ्या ग्रामपंचायतींसह अन्य ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत अनेक गावांत दुरंगी, तिरंगी लढती झाल्यात. यात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह गावनेतेही एकमेकांविरुध्द निवडणूक रिंगणात उतरले होते. सोमवारी सकाळी १० वाजतापासून १५ टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी ९३३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ३८६ उमेदवार निवडून आलेत. ३० जण बिनविरोध निवडून आले आहेत. असे एकूण ४६ ग्रामपंचायतींमध्ये ४१६ उमेदवार विजयी झालेत. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. मतमोजणीची प्रक्रिया तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, निवासी तहसीलदार गोपाल कडू, नायब तहसीलदार दिनेश बढीये, प्रज्ञा मेहंडूले आदींच्या मार्गदर्शनात पार पडली.