व्यापाऱ्यांमध्ये खळबळ : जयंस्तभ चौकातील गुलशन टॉवरजवळील घटनाअमरावती : दुचाकीस्वाराला खाली पाडून १२ लाख ५५ हजार रुपयांची बॅग पळविल्याची घटना सोमवारी शहर कोतवाली ठाण्यांतर्गत गुलशन टॉवरच्या मागील बाजूला घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बडनेरा मार्गावरील केशव अपार्टमेंट येथील रहिवासी धारूजी पथुजी ठाकोर यांनी मंगळवारी व्यापाऱ्यांकडून कुरियरची १२ लाख ५५ हजारांची वसुली केली होती. वसुलीचे पैसे एका हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून ते दुचाकीने घरी जात होते. त्यांच्या दुचाकीला २५ ते ३० वयोगटातील ४ अनोखळी इसमानी धक्का देऊन खाली पाडले. धारुजी खाली पडल्यावर त्यांच्याजवळील पैशांची बॅग आरोपींनी पळून नेली. त्यांनी आरडाओरड करुन आरोपींना पकडण्याचे प्रयत्न केले, मात्र, आरोपी पळून गेले. त्यांनी तत्काळ शहर कोतवाली पोलीस गाठून तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
धक्का देऊन १२ लाख ५५ हजारांची बॅग पळविली
By admin | Updated: April 23, 2015 00:07 IST