चांदूररेल्वे : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके आॅक्सीजनवर असताना शेतातील कृषिपंप बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. मंगळवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात तीन तास ठिय्या दिला. पावसाच्या दडीमुळे व दुबार, तिबार पेरणी केलेली खरीप पिके सुकू लागली. विहिरीतील विद्युत पंप बंद असल्यामुळे उपलब्ध असलेले पाणीही शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरता येत नाही. वीज पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी हजारो शेतकरी मंगळवारी उपविभागीय अभियंता फडणवीस यांचे कार्यालयात धडकले. मंडळाने दिलेले सेवक हे नेमून दिलेल्या गावाला राहात नाही व पैसे मागतात व तक्रारीची दखल नाही अशा आवेशपूर्ण तक्रारी यावेळी करण्यात आल्या. तीन तास विद्युत मंडळात गोंधळाचे वातावरण होते. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांचेशी संपर्क साधण्यात आला. तालुक्यातील रोहीत्र बंद आहे जे आहे त्यावर किटकॅट नाही, केबल नाही व जुनाट साहित्य आहे त्यामुळे लाईन चालू असूनही रोहीत्र बंद राहते याची सुधारणा करा नाही तर शेतकऱ्याच्या पुढील होणाऱ्या अनर्थ परिणामासाठी तयार राहा, असा इशारा आंदोलकांनी दिला. दोन दिवसात समस्या सोडवू, असे आश्वासन विद्युत अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, उमेश केने, प्रवीण घुईखेडकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
चांदूरच्या वीज कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंंदोलन
By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST