हिराबंबई येथील घटना : वनविभागाचा तपास थंडबस्त्यात अमरावती : पश्मिच मेळघाटातील ढाकणा वनपरिक्षेत्रात झालेल्या वन्यप्राण्याच्या शिकारी प्रकरणात तीनही आरोपी अद्यापर्यंत मोकाटच आहे. वनविभागाने तीनही आरोपींना नोटीसा बजावल्यापासून तपासकार्य थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. आठ महिन्यांपूर्वी ढाकणा वनपरिक्षेत्रातील हिराबंम्बई गावानजीक वाघाची शिकार करुन आरोपींनी अवशेष जमिनीत पुरविल्याची माहिती ढाकणा वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली होती. त्यानुषंगाने वनविभागाने १९ मे रोजी शोभाराम पुनिया धांडे, शामलाल शिकारी धांडे व सुभाष शिकारी धांडे यांच्या घरी धाड टाकून पाच ते सहा प्रजातीच्या वन्यप्राण्याची अवशेष जप्त केलीत. यातील शोभारामला वनविभागाने ताब्यात घेतले होते. तर शामलाल व सुभाष पसार झाले. वनविभागाने शोभारामचे बयाण नोंदविल्यावर त्यांने सांगितल्याप्रमाणे वनविभागाने अवशेषांची शोध मोहिम राबवीली. त्यावेळी आरोपीच्या घरामागच्या परिसरातील एका खड्डयामध्ये काही वन्यप्राण्याची अवशेष आढळून आली. वनविभागाने वन्यप्राण्याची अवशेष हैदराबाद व देहरादून येथील प्रयोगशाळेत उत्तरीय तपासणीकरिता पाठविले आहे. त्याचा अहवाल तीन ते चार महिन्यात मिळेल असे वनविभागाकडून सांगण्यात आले. १९ मे रोजी हा वन्यप्राण्याच्या शिकारीचे प्रकरण उघड झाले. मात्र, अद्याप तिन्ही आरोपींना वनविभागाने अटक का केली नसल्याचे माहिती हाती लागली आहे. निसर्ग संवर्धन व वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. मात्र, मेळघाटमधील वन्यप्राण्याच्या शिकारी प्रकरणाच्या तपास गाभिर्यपुर्वक होत नसल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने काही नागरिकांचे बयाण नोंदविले असून तिन्ही आरोपींना नोटीस बजावली आहे. मात्र, अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही. हे विशेष. वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणात वाघाचे अवशेष अद्याप वनविभागाच्या हाती लागले नसल्यामुळे आरोपींना नोटीस बजावून बोलाविण्यात आल्याचे परतवाडा येथील सहायक वनसंरक्षक एस.एस.भागवत यांनी सांगितले. वाघ शिकारीचे कोणतेही पुरावे अद्याप हाती लागले नाही. त्यामुळे आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. परिसरातील नागरिक, पोलीस पाटील व श्यामलाल धांडेचे बयाण नोंदविण्यात आले आहे.-एस.एस. भागवत, सहायक वनसंरक्षक, परतवाडा
वन्यप्राण्यांची शिकार करणारे तीन आरोपी अद्यापही मोकाटच
By admin | Updated: June 1, 2015 00:34 IST